Tuesday, April 6, 2010

एक संध्याकाळ...

एक संध्याकाळ...

एक अशीच निरस, उदास संध्याकाळ.. एकटेपणाच्या अंधारात ढकलून देणारी..
Spiderman सारखं उंचावर कुठसं एकटं बसवून अपूर्णत्व पुन्हा दाखवून देणारी.

दमलेला दिवस अजून 'वेळ झाली नाही' म्हणुन उगाच रेंगाळलेला असतो.. जायची तयारी करून बसलेला, पण प्रत्यक्षात गेलेला नसतो.
दूरदूरच्या घरांचे, झाडांचे, विजेच्या खांबांचे आकार अंधुक अंधुक दिसत असतात.. दिवेही लागलेले असतात पण त्यांना अजून झळाळी आलेली नसते.
रस्त्यानं माणसं घरी निघालेली असतात, ती स्वतःच्याच विवंचनेत चालत असतात, रस्ते क्रॉस करत असतात, जिने चढत असतात... मध्येच एखादी मोटार हॉर्न वाजवून त्यांची तंद्री मोडत असते, पुढच्याच क्षणी ते पुन्हा तंद्रीत जात असतात.

वारा पडलेला असतो, झाडं धीरगंभीर झालेली असतात, डोक्यावर डास फिरत असतात,
बाकीचे पक्षी कधी जातात कोण जाणे, पण कावळे बिचारे इमाने-इतबारे या वेळेला घरी परतत असतात.
झाडाचं पान अन पान वारयासाठी आसुसलेलं असतं... पण
विधीलीखितात त्यानं आत्ता येणं लिहिलेलं नसतं...

एक भेसूर अस्वस्थता भरून राहिलेली असते, श्वासाची लय सापडत नसते,
मज्जातंतू, रक्तवाहिन्या, संवेदना.. सगळ्यांनाच कामाचा कंटाळा आलेला असतो.
मेंदुसुद्धा भरकटलेला असतो, कुठल्याही एका विचाराचा धागा पकडणं त्याला जमत नसतं, आपण नक्की कशा बद्धल विचार करतोय हे ठरवणं सुद्धा त्याच्या आवाक्याबाहेर गेलेलं असतं... चुकून एखादं गाणं गुणगुणावसं वाटलंच तर तेही दोन ओळींपेक्षा जास्त टिकणार नसतं...

आणि हे सगळं कमीच की काय म्हणुन आकाशात ना चंद्र असतो ना चांदण्या... किंवा अगदी अमावास्येचं काळभोर आकाशही नसतं.
नजर भिडावी असं कुठेच काहीच नसल्यानं शून्यात हरवलेली असते.
असा किती वेळ गेला कळलेलं नसतं. मग मी उठतो आणि कुठल्यातरी रस्त्यानं चालू लागतो...
पाय पुढे टाकणं, त्याबरोबर हातांची मागं-पुढं हालचाल करणं, तोल सांभाळणं, रस्ता ओलांडणं, सगळं काही यांत्रिकतेने चाललेलं असतं,
आणि तेवढ्यात अचानक हात पुढे करून तोंडानं काहीतरी बडबडत 'तो' समोर येतो. - एक रुपया द्या साहेब गरीबाला - असंच काहीतरी म्हणत असावा. मी यांत्रिकपणे खिसे चाचपून एक रुपया काढून देतो.

कृतीतली यांत्रिकता अजून संपलेली नसली तरी माझा मेंदू मात्र आता पुन्हा कार्यरत झालेला असतो, विचारांमध्ये सुसूत्रता येऊ लागलेली असते, डोक्यात प्रश्न भिनु लागलेले असतात...
"खरंच, याची सुद्धा ही संध्याकाळ अशीच गेली असेल का? हा या रस्त्याच्या कडेला कुणाची तरी वाट पहात शून्यात नजर लावून बसला असेल का? मनात कुठं एकटेपणाचं, अपुर्णत्वाचं रण पेटलं असेल का? यालाही पडलेला वारा, संवेदनाचं दुबळेपण यामुळे अस्वस्थता निर्माण झाली असेल का?"
मी त्याच्या खालावलेल्या डोळ्यांत खोलवर आत डोकावण्याचा प्रयत्न करतो, त्यातून काही समजतं का ते पहाण्याचा प्रयत्न करतो.
पण छे.. कारुण्य हा एकमेव भाव, बाकी फक्त गारगोट्या असतात त्या...

असं का व्हावं?? मनात विचारांचं काहूर माजतं.
सरतेशेवटी आकलनशक्तीच्या मर्यादा गाठल्यावर मी आजही पुन्हा एकदा त्याच निष्कर्षावर येणार असतो, अगदी तसाच सारांश पुन्हा एकदा काढणार असतो, मनातल्या सगळ्या प्रश्नांचा मिळून एकंच प्रश्न बनणार असतो...
"विरह, हुरहूर, घुसमट, ठेचकाळलेला स्वाभिमान, संवेदनांचा शिथिलपणा... सुरक्षित कवचात आतल्याआत येणारी ही पेल्यातली वादळं आहेत का? की फक्त भरल्या पोटींच सुचणाऱ्या या भावना आहेत?"

या नेहमीच्या सारांशरूपी अनुत्तरीत प्रश्नावर पोचल्यावर आता माझं मन थोडं शांत झालेलं असतं. शून्यातली नजर पुन्हा एकदा वास्तव्यात आलेली असते.
आणि अचानक जाणीव होते की मध्ये बराच वेळ गेलाय...
माझं लक्ष झाडाच्या फांद्यांमधून डोकावणाऱ्या अष्टमीच्या चन्द्राकडे जातं. तो आता मला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत असतो.
वार्याची गार झुळूक माझं अंग-अंग रोमांचित करून जाते. मन एखाद्या अवखळ लहान मुलासारखं खुदकन हसतं...
सगळं जगंच हवंहवंसं, सुंदर दिसायला लागतं!

मी मनातल्या मनात 'त्या' चे आभार मानतो आणि घराच्या दिशेने पाऊल उचलतो.

खरंच... आयुष्यातल्या आनंदाचं, सुखाचं नव्यानं दर्शन घडण्यासाठी एखादा तपस्वी साधू किंवा स्वामीच भेटावा लागतो असं नसतं.!

~ निखिल -
------------------------------------------

8 comments:

Mangesh said...

Maast jamla ahe Rasayan....
kadachit damlelya ashach eka tari he vachlya mula aankhin changla vatla...ashach eka sandhykali fresh kelya baddal dhanyavad

दर्शन... said...

मस्त रे! सहीच झालीये पोस्ट! योगायोगाने आत्ता मी हे वाचत असताना संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्या भावना देखील काहीशा अशाच झाल्या होत्या, त्यामुळे तर मला हे जास्तच भावले... keep it up ! :)

Unknown said...

Jabardast....
Tu kadhi pasun ase lihayla laglas?
[:D]
Nways, khupch mast lihiles...
Keep it up...

Manasi said...

Chhaan!!
Bhavana shabda rupat changalya mandalya aahet. :)

Aaditya said...

सुंदर लेख आहे. फारच छान.

Archis said...

हाय निख्या, तुझ्या ह्या पहिल्या-वहिल्या blog साठी अभिनंदन! वरचेवर लिहित जा. बाय द वे, ही काही माझी काही धावती निरीक्षणे (नवीन शोध: धावती निरीक्षणे = Quick Observations!!) खरडतोय, सविस्तर चर्चा करू नंतर कधीतरी.
१. एकूण प्रकटन सुरेख जमले आहे.
२. एकटेपणाची बोच प्रकर्षाने जाणवून देणाऱ्या संध्याकाळचे वर्णन तर विशेष भावते.
३. तरी अचानकपणे समोर आलेल्या भेटलेल्या भिकार्यामुळे उगीचच विषयांतर झाल्यासारखे वाटले . एकूणच त्या संध्याकाळच्या वातावरणामुळे मनात उठणाऱ्या "विरह, हुरहूर, घुसमट, ठेचकाळलेला स्वाभिमान" वगैरे मिश्र भावनांनीही त्या नेहमीच्या अनुत्तरीत प्रश्नापर्यंत नेले असते!
४. बाकी शेवटाला 'अष्टमीचा चंद्र बघून मनातली दिवसभराची मरगळ पळून गेली' हे सुद्धा आवडले!
५. काही लाजवाब वाक्ये:
१. सुरक्षित कवचात आतल्याआत येणारी ही पेल्यातली वादळं आहेत का? की फक्त भरल्या पोटींच सुचणाऱ्या या भावना आहेत?"
२. माझं लक्ष झाडाच्या फांद्यांमधून डोकावणाऱ्या अष्टमीच्या चन्द्राकडे जातं. तो आता मला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत असतो.
वार्याची गार झुळूक माझं अंग-अंग रोमांचित करून जाते. मन एखाद्या अवखळ लहान मुलासारखं खुदकन हसतं...
सगळं जगंच हवंहवंसं, सुंदर दिसायला लागतं!
३. आयुष्यातल्या आनंदाचं, सुखाचं नव्यानं दर्शन घडण्यासाठी एखादा तपस्वी साधू किंवा स्वामीच भेटावा लागतो असं नसतं.!

पुढच्या लेखनास शुभेच्छा!
(बरेच दिवसांपासून लिहू-लिहू म्हणत एक ओळदेखील न लिहिणारा पण इतरांच्या प्रकटनावर "माझ्या मते..." म्हणत बराच पाल्हाळ लीव्नारा) आर्चिस
दि: ११-एप्रील-२०१०
ठिकाण: आफ्रिकेतले निर्मनुष्य जंगल!

Aaditya said...

Chhan ahe ha bolg. Awadla mala...

pramod khadilkar said...

खूप दिवसांच्या नंतर अभिप्राय पण तरीही . . .
संध्याकाळ हा विषयच असा आहे कि मस्त काही तरी वाचायला मिळतं.. हो पण ह्यात तुझ्यातल्या संवेदनशील लेखकाचा अनादर करायची इच्छा नाही. तू झकासच लिहिलं आहेस.
"दमलेला दिवस अजून 'वेळ झाली नाही' म्हणुन उगाच रेंगाळलेला असतो.. जायची तयारी करून बसलेला, पण प्रत्यक्षात गेलेला नसतो." ह्या ओळी विशेष आवडल्या,
मस्त .. नेहमीच म्हणतो ज्यांना असं काही सुचतं त्यांनी लिहित राहिलं पाहिजे :)